अशोक काकडे : पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार
“कडेपूर ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांच्या शेत बांधावर नारळ वृक्षांची लागवड करण्याचा घेतलेला उपक्रम हा केवळ एक पायलट प्रोजेक्ट नसून, संपूर्ण जिल्ह्यासाठी अनुकरणीय ‘कडेपूर पॅटर्न’ ठरणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना अन्नप्राप्तीचा नवा स्रोत उपलब्ध होईल, शेताची हद्द कायमची सुरक्षित होईल आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बांधावर वृक्षांची लागवड करावी,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
कडेपूर (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा ‘निमित्त आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी काकडे बोलत होते. यावेळी कडेपूरचे सरपंच सतीश देशमुख, उपवनरक्षक अधिकारी सागर गवते, उपजिल्हाधिकारी विजया यादव, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, सामाजिक वनाधिकारी प्रशांत वरुडे, तहसीलदार अजित शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुका कृषी अधिकारी संभाजी पतकुरे, सहायक कृषी अधिकारी अतुल बामणे, कृषी विस्तार अधिकारी सिद्धनाथ काळेळ, कार्यक्रम अधिकारी मेहमूद पटेल, शकील मुलाणी, आदी मान्यवरही सहभागी झाले.






