गरीब, भूमिहीन व बेघर नागरिकांपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी तातडीने पाठपुरावा करावा अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नंदिवाले समाजातील लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचे वाटप प्रसंगी दिल्या. राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने कडेगाव तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भटक्या व विमुक्त जातीच्या नागरिकाना दाखल्यांचे प्रातिनिधिक वितरण जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वतः झोपडपट्टीत जाऊन दाखले दिल्याने जिल्हाधिकारी यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
यावेळी प्रांताधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार अजित शेलार, गट विकास अधिकारी प्रशांत राउत, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अधिकराव जाधव प्रमुख उपस्थिती होते.
जिल्हाधिकारी काकडे म्हणाले की, शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विभागांनी गतीमान काम करुन लोकाभिमुख कार्यपद्धतीचा अनुभव जनतेला दिला आहे, त्यातुन शासनाप्रती जनतेमध्ये चांगला दृष्टीकोन तयार होत आहे. अनेक प्रकल्प, मोठे कामे या शंभर दिवसाच्या कालावधीत करण्यात येत आहेत, अनेक पूर्ण झाली आहेत. शासनस्तरावरील विविध कल्याणकारी योजना गरजूंना उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी मंडळ अधिकारी मनोहर पाटील, सरपंच संजना माळी, सोसायटी चेअरमन प्रविण पवार, उपसरपंच सुरज पवार, माजी सरपंच हणमंतराव पवार, माजी उपसरपंच संभाजी शेळके, जयंत पाटील, आकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य विराज पवार आदिसह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत आणि प्रास्ताविक प्रांताधिकारी रणजीत भोसले यांनी तर आभार सेतु व्यवस्थापक प्रविण पवार यांनी मानले.
